Wheather Update : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बऱ्याच भागात रविवारी (ता.26) गारपिटीसह वादळी पाऊस पडला. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही जिल्ह्यात आज सोमवारी (ता.27) पुन्हा गारपीट व वादळी पाऊस पडण्याचा इशारा देऊन राज्यातील इतर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Warning of hailstorm and stormy rain again today in Maharashtra
हवामान विभागाने रविवारी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार नाशिक, जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दिवसा व रात्री हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपीट सुद्धा झाली. या पावसामुळे शेतांमधील काढणी शिल्लक राहिलेल्या भाजीपाला पिकांसह द्राक्ष, कांदा तसेच हरभरा, गहू पिकाचे आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज सोमवारसाठी विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम तसेच मराठवाड्यातील जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय ठाणे, मुंबई व रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार बऱ्याच जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली सुद्धा आहे.
बुधवारी वातावरण निवळण्याची शक्यता
अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे बहुतांश भागात रब्बी पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऐन तोंडाशी घास आलेला असताना अस्मानी संकटाने तो हिरावून घेतला आहे. दक्षिण अंदमानातील समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्याची तीव्रता मंगळवार (ता.28) पर्यंत कायम राहून बुधवारी मात्र वातावरण निवळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)