PM Kisan Scheme : केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ म्हणजेच ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ योजनेप्रमाणेच राज्य शासनानेही ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना अंमलात आणली आहे. मात्र, राज्यातील हजारो शेतकरी अजुनही दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे, ती आधार क्रमांकाशी बँक खाते संलग्न करण्याची क्लिष्ट प्रक्रिया आणि ई-केवायसीची अट. एकूण सर्व गोंधळामुळे राज्यातील सुमारे 93 हजार शेतकऱ्यांना खासकरून पीएम किसानचा 15 वा आणि नमो किसानचा दुसरा हप्ता मिळू शकलेला नाही.
Due to this, thousands of farmers did not get the benefit of ‘PM Kisan’ scheme
आधार संलग्नता तसेच ई-केवायसी पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना केंद्र सरकारची पीएम किसान तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा एकत्रित लाभ देता आला नसल्याचे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आधार संलग्नता आणि ई-केवायसी पूर्तता न केलेल्या शेतकऱ्यांनी आता त्यांच्या गावातील कृषी सहाय्यकांची मदत घ्यावी. त्यामुळे त्यांना 15 वा तसेच 16 वा हप्ता मिळण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत, असेही कृषी विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पीएम किसानचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दिला जात असल्याने तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या हजारो शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. राज्य शासनाकडून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता वितरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारण डिसेंबर महिना अखेर आधार संलग्नता तसेच ई-केवायसी पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांनी आधार संलग्नता व ई-केवायसीची पूर्तता केलेली नाही त्यांनी ती तातडीने करून घ्यावी, असे आवाहन त्यामुळे कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
थकीत हप्त्याबद्दल शेतकऱ्यांत साशंकता
आधार संलग्नता तसेच ई-केवायसीची अट नसताना राज्यातील सुमारे 85 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसानचा 14 वा हप्ता मिळाला होता. मात्र, 15 व्या हप्त्यासाठी पुन्हा ई-केवायसीची अट पुन्हा लागू झाल्याने फक्त 84 लाखावर शेतकऱ्यांनाच पीएम किसानचा लाभ मिळाला. आधार संलग्नता आणि ई केवायसीची पूर्तता न करणाऱ्या सुमारे 93 हजार शेतकऱ्यांना 15 व्या हप्त्यापासून वंचितच राहावे लागले. आता थकीत रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते किंवा नाही, त्याबद्दल संबंधित सर्व शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.