Maharashtra Assembly Winter Session : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार (ता.07 डिसेंबर) पासून नागपूरच्या विधानभवनामध्ये सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शासनाने नियमानुसार राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना बुधवारी (ता.06) चहापानासाठी आमंत्रित केले होते. मात्र, विरोधकांनी राज्य शासनाचे आमंत्रण धुडकावून चहापानावर बहिष्कार टाकला. नंतर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन चहापानावरील बहिष्काराचे कारणही स्पष्ट केले.
Opponents boycott government tea party for ‘this’ question of farmers
अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अद्याप पंचनामे सुरू केलेले नाहीत. त्यामुळे कोणालाच नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. पीकविमा कंपन्यांचाही सावळा गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असतानाही विमा कंपन्या दाद देत नसल्याचे दिसून आले आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे सर्व काही शासनाकडून मिळाले पाहिजे, अशी मागणी विशेषतः विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यासंदर्भात सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारावी तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा व्हावी, अशीही अपेक्षा विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात कोणकोणते मुद्दे मांडणार त्याविषयी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील यावेळी उपस्थित होते.