गावशिवार न्यूज | सन 2015 मध्ये सुरूवातीच्या दोन महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे विशेषतः कोकण किनारपट्टीच्या भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. संबंधित सर्व आंबा उत्पादकांना नुकसानीच्या कालावधीकरीता सुमारे 2 कोटी 71 लाख 46 हजार रूपयांची व्याजमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (Mango Farmer)
याशिवाय सन 2014/15 वर्षातील रूपांतरीत कर्जावरील 2015/16 या वर्षातील संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे सहा टक्के व्याज रूपांतरीत कर्जाचा बप्ता विहीत मुदतीत परत करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात सन 2015 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने आंब्याच्या बागांसह अन्य बऱ्याच पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 11 हजार 783 शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याज माफीवरील 2 कोटी 71 लाख 46 हजार रूपयांची कर्जावरील व्याजमाफी देण्यात येणार आहे.
रूपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता मुदतीत परत करण्यास देखील मिळाली मान्यता
विशेष म्हणजे कोकणातील 2014/15 वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठ झालेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना 2015/16 मधील संपूर्ण व्याज माफ करण्यात येणार आहे. याशिवाय पुढील 4 वर्षांचे सहा टक्के दराने होणारे व्याज 4 कोटी 98 लाख 85 हजार रूपये रूपांतरीत कर्जाचा हप्ता मुदतीत परत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित बँकांनी रत्नागिरी जिल्हा उपनिबंधकाकडे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.