Marathwada : कायम दुष्काळाच्या छायेखाली वावरणाऱ्या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला लवकरच चालना मिळणार आहे. पूरग्रस्त कोल्हापूर व सांगलीचे पूर व्यवस्थापन करून अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे.
मराठवाड्याला पाणीदार करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची आढावा बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केली होती. त्यास खासदार संजयकाका पाटील, मुख्य सचिव नितीन करीर, मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, नाबार्ड अधिकारी तसेच विविध विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाला चालना देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, याशिवाय, नाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4 हजार 643 कोटी रुपये खर्च येणार असून, सिंचनक्षमता वृद्धीसाठी 155 प्रकल्पांच्या कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 5 हजार 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 38 अपूर्ण प्रकल्प पूर्णत्त्वास नेली जाणार आहेत, अशी एकूण 15 हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)