Agriculture News : जळगाव जिल्ह्यात रविवारी (ता.26 नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे सुमारे 552 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. त्यात पाचोरा, चाळीसगाव व जामनेर तालुक्यातील पीक नुकसानीची नोंद घेण्यात आली आहे.
552 hectares of agriculture lost due to unseasonal rains in Jalgaon district
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, रविवारी पाचोरा तालुक्यातील तीन गावांमधील आठ शेतकऱ्यांचे 04 हेक्टर क्षेत्रावरील केळीबागांचे तसेच 03 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील 10 गावांमधील 680 शेतकऱ्यांचे 38 हेक्टरवरील हरभरा पिकाचे, 39 हेक्टरवरील गहू पिकाचे, 78 हेक्टरवरील मका पिकाचे, 75 हेक्टरवरील ज्वारीचे, 216 हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय जामनेर तालुक्यातील 42 गावांमधील 438 शेतकऱ्यांचे 23 हेक्टरवरील हरभरा पिकाचे, 21 हेक्टरवरील गहू पिकाचे, 17 हेक्टरवरील मका पिकाचे, 11 हेक्टरवरील ज्वारी पिकाचे, 07 हेक्टरवरील भाजीपाला पिकाचे, 14 हेक्टरवरील केळी बागांचे आणि 06 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक 446 हेक्टरवरील पिकांचे नुकसान चाळीसगाव तालुक्यात झाले आहे.
उर्वरित तालुक्यातही पीक नुकसानीसह पशूहानीची नोंद
■ भडगाव तालुक्यात आडळसे येथे श्रीमती प्रतिक्षा गणेश साळुंके या विजेमुळे जखमी झाल्या असून, त्यांच्यावर चाळीसगावात उपचार सुरु आहे. याशिवाय सावदे, दलवडे, घुसर्डी येथील पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाल्याचे तहसीलदारांनी कळविले आहे.
■ चोपडा तालुक्यात सत्रासेन येथे सुभाष संजय पाटील यांच्या घराचे पावसामुळे अंशतः नुकसान झाल्याचे तहसीलदारांनी कळविले आहे.
■ मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे निमखेडी बु।। येथे कापूस व तूर पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच घोडसगाव येथे एका घराचे व शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे तहसीलदारांनी कळविले आहे.
■ बोदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मनुर बु।। येथे मोसंबी/सीताफळ या फळपिकांचे तसेच निमखेड व शेलवड भागात तूर, कपाशीचे काही प्रमाणात नुकसान झाले.
■ जामनेर तालुक्यात सामरोद येथे सुनील धनराज पाटील यांच्या मालकीची एक म्हैस वीज कोसळल्याने दगावली. तसेच अंदाजे 10 ते 11 हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले.
■ चाळीसगाव तालुक्यात शिरसगाव येथे निंबा भिकन चव्हाण यांच्या मालकीच्या 02 गायी वीज व गारपिटीमुळे दगावल्या. तसेच शेती पिकांचे नुकसान झाले.