Dhananjay Munde : राज्यातील पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्याकरिता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात झालेल्या चर्चेनंतर पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री श्री. मुंडे म्हणाले, की चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली आहे. सन 2016 नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे. तथापि, याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पिक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला जात आहे. त्याची कार्यपद्धती, योजना व अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करावी. या समितीची कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करुन एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावा.
वंचित शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतींच्या बाहेर लावण्यात येणार
बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पीक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना देखील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)