Girish Mahajan : राज्याच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने दळणवळण सुविधा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्यभरात आणखी सुमारे 7 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी त्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील टप्पा क्रमांक दोनमध्ये सुमारे 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने बाळगले आहे. त्यापैकी 7 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते देखील ठरले आहे. दरम्याल, सध्या 3 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या टप्प्यात संशोधन व विकासासाठी आणखी 7 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खदानी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून 10 किलोमीटरच्या आणि नगरपालिका, नगरपरिषदा, छावणी बोर्ड हद्दीपासून 5 किमीच्या मर्यादेतल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी निवड करण्यात येईल. रस्त्यांची दर्जोन्नती केलेल्या मात्र पुलांअभावी दळणवळण होत नसलेल्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहेत.