अतिदुर्गम आंबापाणीपर्यंत 20 किलोमीटर पायपीट करत पोहोचले जळगावचे जिल्हाधिकारी

Jalgaon News : सातपुडा पर्वतरांगात वसलेल्या अतिदुर्गम अशा आंबापाणी (ता.यावल) गावातील आरोग्य, शिक्षण व मुलभूत सुविधा जाणून घेण्यासाठी तसेच तेथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तब्बल 20 किलोमीटरची पायपीट जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. आंबापाणी गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या.

Collector of Jalgaon reached to village Ambapani by walking 20 kilometers

जिल्हाधिकाऱ्यांसोबतच यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनीही पायपीट केली. त्या देखील जिल्हाधिकाऱ्यांसोबत दुर्गम आंबापाणी गावापर्यंत पायपीट करत पोचणाऱ्या पहिल्या महिला तहसीलदार ठरल्या. आंबापाणीला जाण्यासाठी हरीपुरा गावापासून पायी चालत प्रवास करावा लागतो, परतीचा प्रवास करुन हे अंतर सुमारे 20 किलोमीटर होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाचा निर्धार करत हरीपुरापासून चक्क पायपीट प्रवास करत आंबापाणी गाठले. आंबापाणीला पोहचल्यावर त्यांनी मतदार यादीतील नोंदणीविषयी माहिती घेतली, मतदान केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. चोपडा मतदारसंघातील हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकमेव कच्चे मतदान केंद्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे आणि अंगणवाडीचे पक्के बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. महिला मतदारांची संख्या कमी असल्यामुळे कारणांचा शोध घेवून त्यांची नोंदणी वाढविण्यात यावी. मयत मतदारांची नावे देखील तत्काळ कमी करण्यात यावी. मतदान केंद्रावर मतदान पथकातील टीम आणि मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखडा योग्य पद्धतीने नियोजन करण्यात यावा. मतदार केंद्रावर ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व लोकांनी मतदान करण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ‌ गावकऱ्यांना केले. दरम्यान, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन शैक्षणिक स्थितीबद्दल माहिती जाणून घेतली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या. ग्रामस्थांनी त्यांची कला, संस्कृती, परंपरा, शिक्षण, उपजिविका, दैनंदिनी अडचणींबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.

आंबापाणी गावात आता राबविले जातील अशा प्रकारचे विविध उपक्रम
■ आंबापाणी या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यानंतर या गावाला ‘एलजीडी कोड’ देण्यात येईल. यामुळे सदर गाव शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र होईल. सदर गावाचा गावठाण बाबतचा प्रस्ताव मार्गी लावण्यात येईल.

■ गावातील रहिवासी नागरिकांना शंभर टक्के जातीचे दाखले आणि जन्म प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड याबाबत कॅम्प घेऊन काम करण्यात येईल. गावात गर्भवती महिला व नवजात बालके यांचे लसीकरण व आरोग्य विषयक सुविधा यांकरिता लसीकरण शिबिर व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल.

■ आंबापाणी गावात रोजगार हमी योजनेतून रस्त्यांचे कामकाज करण्यात येईल. शेत जमीन सपाटीकरण व फळपीक लागवड या विषयांवर काम करण्यात येईल. आदिवासी विकास विभागामार्फत शबरी घरकुल योजना प्रस्तावित करण्यात येईल.

WhatsApp Group
Previous articleपिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे नागपूरहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते लोकार्पण
Next articleकोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरतील कापसाच्या ‘या’ तीन नवीन जाती