गावशिवार न्यूज | शेतकरी, वंचित, दुर्लक्षित घटक, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. जळगाव जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. (Republic Day)
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी शुभेच्छा संदेशात पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, प्रांतधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्ह्यात 2022 व 2023 या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या 89 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 83 कोटींची नुकसान भरपाई , चालू वर्षाच्या खरीप हंगामामध्ये 7 तालुक्यातील 27 महसूल मंडळात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 76 कोटी 40 लाखांची विमा भरपाई , सन 2022 – 23 या वर्षात 80 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 48 कोटी 45 लाखांची पीक विमा रक्कम वर्ग करण्यात आली आहे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेंतर्गत 44 हजार शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात 325 कोटी 90 लाखांचा पीक विमा वर्ग करण्यात आला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलीत औजारांसाठी 1 हजार 698 लाभार्थ्यांना 13 कोटी 98 लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना पीक कर्ज व अनुदानाचे वाटप
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चालू वर्षात 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना 871 कोटी 69 लाखांचे खरीप पीक कर्ज वाटप झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात जवळपास 26 टक्क्यांनी जास्त आहे. “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान”योजनेत जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 799 कोटी 53 लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 61 हजार शेतकऱ्यांना 921 कोटी 61 लाखांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला असून 56 हजार शेतकऱ्यांना 212 कोटी 36 लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले आहे.