गावशिवार न्यूज | वडिलोपार्जित भरपूर शेती असली तरी पारंपरिक पिकांपासून फार काही कमाई होत नसल्याने ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील तरूण शेतकरी चंद्रकांत निळकंठ पाटील हे हताश झाले होते. कमी कालावधीत चांगले उत्पादन व आर्थिक कमाई देणाऱ्या फळपिकांच्या लागवडीकडे वळल्यानंतर आता त्यांचे दिवस पालटले आहेत. फक्त 2 एकरात सुमारे 3 लाखांची कमाई देणारे खरबूज पीक त्यांच्यासाठी कपाशीपेक्षा सवाई ठरले आहे. (Success Story)
प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून लागवड केलेल्या खरबूज पिकाने चंद्रकांत पाटील यांना लखपती केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनीही तोंडात बोट घातले आहे. कारण, अवघ्या अडीच महिन्यात शेतकरी पाटील यांनी सर्व किमया साधली आहे. लागवडीसाठी त्यांनी सागर बायोटेकचे जान्हवी वाण वापरले होते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी चिकट सापळे उपयोगात आणल्याने फळांचा दर्जा उत्तम राखला गेला. दोनवेळा तोडणी केल्यानंतर खर्च वजा जाऊन त्यांच्या हातात सुमारे 3 लाखांचा नफा शिल्लक राहिला. कमी कालावधीत चांगला फायदा झाल्यानंतर हुरूप वाढल्याने शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी आणखी तीन एकरावर खरबुजाची लागवड केली आहे.
(सविस्तर माहितीसाठी कृपया खालील व्हिडीओ अवश्य पाहा)